देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे . ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफरी या सत्रात बोलत होते. ग्राफीक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता असणं एआयच्या प्रसारासाठी आवश्यक आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे सरकार ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैष्णव म्हणाले. आतापर्यंत ३८ हजार जीपीयू पॅनलमधे समाविष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. या सत्रात मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तिना जॉर्जव्हा यांनी भाग घेतला.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी मोठी यंत्रणा नाही तर लहान लहान मॉडेल्स उपयोगी पडतील असं दावोस इथं प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अश्विनी वैष्णव म्हणाले. भारतात १२ एआय मॉडेलची बांधणी केली जात असून हे विविध उद्योग क्षेत्रांच्या गरजा भागवण्यासाठी सक्षम आहेत, असं ते म्हणाले. सेमिकंडक्टर निर्मिती, पायाभूत सुविधा तसंच ऊर्जा क्षेत्रातल्या एआयच्या मूल्य साखळीच्या प्रगतीचाही वैष्णव यांनी यावेळी उल्लेख केला.