विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवले आहेत. नव्या भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेली धोरणं पुढीलप्रमाणे…
भारताच्या विकासाच्या प्रवासात २०२५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरलं. रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुविधांमधे यावर्षी मोलाची भर पडली. दुर्गम भागापासून मोठ्या शहरांपर्यंत संपर्काचं जाळं तयार झालं. पायाभूत सुविधांसाठी सरकारने केलेली भांडवली गुंतवणूक चालू आर्थिक वर्षात सव्वा अकरा लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. याचा जीडीपीमधला वाटा ३ पूर्णांक एक दशांश टक्के आहे, तर २०४७ पर्यंत प्रत्येक १२ ते १८ महिन्याला जीडीपीमधे एक ट्रिलियन डॉलरची वाढ होण्याचा अंदाज आहे. या वर्षात आर्थिक वाढीमधे पायाभूत सुविधांचा वाटा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह १६० पेक्षा जास्त नवीन विमानतळं, तमिळनाडूमधला समुद्री पूल, नौदलामधल्या पायाभूत सुविधा, ९९ टक्के रेल्वेंचं विद्युतीकरण अशा अनेक पायाभूत सुविधांची या वर्षात भर पडली. त्यामुळे विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे देशाची दमदार वाटचाल सुरू असल्याचं दिसून येतं.