मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमीत्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला. मणिपूरमधला हिंसाचार वांशिक स्वरुपाचा आहे, आणि तो रोखण्यासाठी सरकार कुकी आणि मैतेई या दोन्ही समुदायांसोबत चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. तिथली परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.