डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे, केंद्रीय कृषिमंत्र्यांचं प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आज साजरं होत असलं, तरी भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे. विश्वकल्याणाची भावना भारताच्या नसानसांत आहे आणि हाच सहकाराचा मंत्र आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतीशी संलग्न विविध उद्योगांद्वारे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं, तसंच शाश्वत शेतीद्वारे निसर्गाचा समतोल राखणं यासाठी आणलेल्या विविध योजनांचा उल्लेख शिवराज सिंह चौहान यांनी केला. या योजनांच्या केंद्रस्थानी अल्पभूधारक शेतकरी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, देशवासीयांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्टं असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेडसारख्या संस्था शेतकऱ्यांचं पीक खरेदी करून त्याचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांना देतात, याकडे चौहान यांनी लक्ष वेधलं. प्रयोगशाळांमध्ये संशोधन करणारे कृषी वैज्ञानिक आणि शेतात काम करणारे शेतकरी यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी सरकारनं विशेष योजना राबवल्याचा उल्लेखही कृषिमंत्र्यांनी केला. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि इतर यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा