राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर बसदी चौराहा इथं आज सकाळी एक टेम्पो आणि ट्रक एकमेकांवर धडकले. मृतांपैकी बहुतेक जण उत्तर प्रदेशातल्या एटाह जिल्ह्यातले रहिवासी होते आणि ते सिकर जिल्ह्यात खाटू श्याम जी मंदिरात दर्शन करून परतत होते.
गंभीर जखमी झालेल्या आठ जणांना जयपूरमधल्या एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर इतर तिघांवर दौसा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.