जम्मू कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप पोहचली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.
काश्मिरमधे अडकलेल्या राज्याच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचं एक विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. इंडिगो एअरलाईन्सचं एक विमान 83 पर्यटकांना परत आणेल. ही दोन्ही विमानं सायंकाळी सुमारास मुंबईत उतरतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी समाजमाध्यमावर सांगितलं आहे. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांवर काल रात्री डोंबिवलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या तिघांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. पनवेलचे दिलीप देसले यांच्या पार्थिवावर काल पनवेल मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावर पुण्यात वैकुंठधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमानतळावर केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आरोग्यमंत्री दत्ता भरणे, आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मृतांच्या कुटुंबांशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं.