जागतिक पातळीवर नवीन सत्ताकेंद्र निर्माण झाल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवी सत्ताकेंद्रं तयार झाली आहेत, असं निरीक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आज पुण्यात नोंदवलं. सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या २२व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. आज एखादा देश कितीही ताकदवान असला, तरी सगळ्याच बाबतीत तो आपलं म्हणणं इतरांवर लादू शकत नाही. व्यापार, शस्त्रबळ, संसाधनं, तंत्रज्ञान, प्रतिभा या विविध क्षेत्रांमध्ये ताकद या शब्दाच्या कितीतरी व्याख्या नव्याने तयार होत आहेत. आता सर्व देशांमध्ये एक नैसर्गिक स्पर्धा दिसत असून त्यातून एक समतोल साधला जात आहे, असं मत त्यांनी मांडलं. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेनं बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अद्ययावत राहण्यासाठी उत्पादन क्षेत्रात मोठी क्षमता विकसित करणं गरजेचं आहे, असंही जयशंकर म्हणाले.