गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदार संघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं, असं निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
याबाबत दहा उमेदवारांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी आठ अर्जदारांच्या उपस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या. दोन अर्जदार उपस्थित राहिले नाहीत. यात दहा मतदार संघांमधल्या ४८ बॅलेट युनिटस, ३१ कंट्रोल युनिटस आणि ३१ व्हीव्हीपॅटच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीमध्ये मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीत कसलीही तफावत आढळली नाही.
पनवेल, अलिबाग, अर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर या मतदान संघांमधल्या, तसंच माजलगाव मतदार संघांमधल्या उर्वरीत तीन मतदान यंत्रांच्या संचावर मॉक पोलची चाचणी घेण्यात आली. त्याच्या आधी आणि नंतरही अधिकृत अभियंत्यांनी या यंत्रांची चाचणी घेतली. या चाचणीतही व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीत तफावत आढळली नाही, असं निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
कोपरी-पाचपाखडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगाव या मतदार संघांमध्ये बर्न्ट मेमरी आणि मायक्रो कंट्रोलरची तपासणी करण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. त्यातही सर्व मतदान यंत्रं योग्य ठरल्याचा निर्वाळा इसीआयएल या उत्पादक कंपनीच्या अधिकृत अभियंत्यानी दिला.