मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. यावर्षीच्या इंडिया मेरिटाईम परिषदेत जागतिक स्तरावरील नील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते उपस्थितांशी संवाद साधतील.
सागरी अमृत काल व्हिजन २०४७ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी, भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठीची वचनबद्धता दर्शवणारा हा उपक्रम आहे. यामध्ये जलवाहतूक, बंदरे, जहाजबांधणी, क्रूझ पर्यटन आणि नील अर्थव्यवस्थेतील आघाडीच्या भागधारकांना एकत्रित आणण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात ८५ हून अधिक देशांचा सहभाग असेल, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक प्रतिनिधी आणि ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहे.