राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरूच आहे. येत्या सोमवारपर्यंत जिल्ह्याच्या किनारी भागात आणि इतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहराला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात सर्वाधिक पाऊस होत आहे. महाबळेश्वर, पाचगणी इथंही पावसाची संततधार असून कोयना, कृष्णा, वेण्णासह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसामुळं जिल्ह्यात आतापर्यंत ४० घरांची पडझड झाल्याची, तसंच ३०६ गुरं दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
नांदेडमधे आज दुपारपासून मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं आज यलो तर उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
लातूर जिल्ह्यात मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस होत आहे. परिसरातले प्रकल्प आणि बंधारे भरले तर विसर्ग सुरु करावा लागेल. त्यामुळे नदीकाठावरच्या शेतकरी आणि रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे करुळ घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळवावी लागली. जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवून मार्ग तासाभरानं सुरळीत करण्यात आला.