देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी संवाद साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातली ६४३ गावं पुरामुळं बाधित झाली असून, एक लाख ६४ हजार ८०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. पुरात ३५ हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी ८१ मदत छावण्या उभारल्या आहेत. राज्यात सततच्या पावसामुळं १०२ भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत आणि राज्यातील रस्ते संपर्क विस्कळीत झाला आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, पोलिस, निमलष्करी दल, रेडक्रॉस, अग्निशमन दलांकडून पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश नद्यांचं पाणी उतरलं आहे.
आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर असून २१ जिल्ह्यांमधल्या ६ लाख ३० हजारांहून अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या दीड हजारांहून जास्त गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून १४ हजार ७०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. SDRF आणि NDRFची पथकं बचावकार्य करत आहेत. ब्रह्मपुत्रा, बराक आणि इतर उपनद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२३ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात सध्या ४० हजारांहून जास्त जणांनी आश्रय घेतला आहे.
सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं रस्ते संपर्क तुटल्यानं, अडकून पडलेल्या १५० पर्यटकांपैकी ३४ जणांची काल सुटका करण्यात आली. उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायु दल आणि आपत्ती निवारण दलानं आज सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. चाटेन इथं १३० पर्यटक असून ते त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. एनडीआरएफच्या सॅटेलाईट फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यात महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांचा समावेश असून त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारनं स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून मदतकार्याचा आढावा घेतला,