राज्यात पूरामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली.
राज्यातल्या एकंदर ६८ लाख ६९ हजार ७५३ हेक्टरवरच्या पिकाचं या पावसामुळं नुकसान झालं असून २९ जिल्ह्यांमधल्या २५३ तालुक्यांतल्या २ हजार ५९ मंडळांतल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात वार्ताहर परिषदेत जाहीर केलं. यापैकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
विहिरी, पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी, तसंच घरं, दुकानं, गोठे, जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं फडनवीस यांनी सांगितलं. तसंच, खरडून गेलेल्या जमिनीसाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई, तर ३ लाख रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देऊ, अशी माहितीही त्यांनी दिली. दुष्काळाच्या तरतुदी इथंही लागू करून त्यानुसार कार्यवाही करू, असा पुनरुच्चार फडनवीस यांनी केला.