प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट झाला असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. मजबूत सीमा, अद्ययावत सेनादलं, देशातच तयार झालेली शस्त्रास्त्रं, संरक्षण उत्पादनांची विक्रमी निर्यात, जागतिक स्तरावर अधिक विश्वास, आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल या शब्दांमधे राजनाथ सिंग यांनी संरक्षण क्षेत्राच्या गेल्या ११ वर्षातल्या वाटचालीचं वर्णन केलं आहे.
देशाची संरक्षण उत्पादन निर्यात २०१४-१५ मधे १ हजार ९४१ कोटी होती ती २०२४-२५ या वर्षात २३ हजार ६६२ कोटी रुपये झाली. त्यापूर्वी संरक्षण विभागाला शस्त्रास्त्रं आणि इतर उत्पादनांसाठी इतर देशांवर अवलंबून रहावं लागत होतं. मात्र आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मुळे भारताची संरक्षण उत्पादन निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. १०० हून अधिक देशांना भारताकडून संरक्षण उत्पादनं निर्यात केली जातात. एलसीएच प्रचंड, तेजस लढाऊविमानं, ब्राह्मोस क्षेपणास्त्र, अशा विविध देशांतर्गत उत्पादनांमुळे संरक्षणाची मजबूत फळी उभारली गेली आहे. त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणुकीचा ओघही वाढता राहिला आहे. ११ वर्षांच्या रक्षाशक्ती कालावधीत ताकद,आत्मनिर्भरता, आणि जागतिक नेतेपदाकडे भारताची वाटचाल होत आहे.
गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद होत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.