राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं. भिमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रशाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले. बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स्थापन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भिवंडी शहर आणि परिसरात आशिया खंडातील सर्वात चांगला लॉजिस्टीक हब निर्माण होऊ शकतो, यातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. या भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल, असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली.
आर्थिक लाभाच्या फसव्या योजनांच्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
