डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम-मुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी सरकारने देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एका वर्षात ३० लाख घरं देण्याचा विक्रम केला, ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य, १५ कोटी घरांना नळजोडणी, १२ कोटी घरांमधे शौचालय दिलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेल्वेसाठी भरीव तरतूद केली असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात ६८ कोटी फूटपाथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधीचा लाभ मिळाला, ५२ कोटींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजने अंतर्गत कर्ज मिळालं, ५५ कोटी जनधन खाती काढण्यात आली, पीएम किसान योजने अंतर्गत ११ कोटी शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटींपेक्षा जास्त लाभ मिळाला असं मुख्यमंत्री म्हणाले. थेट लाभाच्या योजने अंतर्गत ४३ लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनली असून  प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली भारत निर्माण झाला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांच्या अपघाताला प्रचंड गर्दी कारणीभूत असल्यामुळे सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहर परिषदेत  एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. उपनगरी गाड्यातले अपघात थांबवण्यासाठी गर्दी नियंत्रणात आणणं गरजेचं आहे, त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, खासगी कंपन्यांना वेळेत बदल करणं शक्य नाही. त्यामुळे त्यासाठी वेगळा उपाय शोधला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. वातानुकूलित रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा