आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बराक, बुऱ्ही दिहिंग, कोपिली, सोनई, कटखल या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. या पुरामुळे १९ जिल्हे, दीड हजारांहून जास्त गावं आणि सहा लाखांहून अधिक जण प्रभावित झाले आहेत. पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून १९० मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात ४१ हजारांपेक्षा जास्त जणांनी आश्रय घेतला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या चोवीस तासात आसाममधल्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.