विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यातले १५ हजार ६४८ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी साडे ३ हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपये तर एसटी महामंडळासाठी २ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयुष्मान भारतासाठी सव्वा ३ हजार कोटी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद सरकारनं यात केली आहे.
विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून चैनसुख संचेती, समीर कुणावार, किशोर पाटील, सरोज अहिरे, राहुल पाटील, उत्तम जानकर आणि रामदास मसराम यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली.
काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी हे अधिवेशन वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कामकाज घाईघाईनं उरकलं जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
यावर विधिमंडळाचं अधिवेशन आणि कामकाज यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं निर्णय होतो, त्यामुळे आता त्यावर वेगळी चर्चा होणार नाही, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तर आचारसंहितेमुळे हे अधिवेशन अल्पकालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यानंतर विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विधानपरिषदेत तालिका अध्यक्ष म्हणून अमित गोरखे यांची निवड करण्यात आली. तसंच अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, सुनील शिंदे, कृपाल तुमाने यांची तालिका सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पणन मंत्री, ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री यांनी अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले. त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.