देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. विकसित भारत युवा नेता संवाद २०२६ परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.
तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्याय आणि सामाजिक विकास अशा क्षेत्रांमध्ये विविध उपाय सुचवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं हे या संवादामागचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.
भारतापुढे केवळ देशाच्या सीमा संरक्षित ठेवण्याचंच आव्हान नाही, तर आर्थिक आघाडीवरही देशाला सज्ज राहावं लागतं, असं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केलं. तुम्ही युवा स्वतंत्र भारतात जन्माला आलात हे तुमचं भाग्य आहे, असंही ते म्हणाले.