घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर यावर्षी एप्रिल महिन्यात कमी होऊन ८५ शतांश टक्क्यावर आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मार्च महिन्यात हा दर अडीच टक्के होता. खाद्यान्न, इंधन, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती घटल्याने महागाई दरात घट झाली आहे.
खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाई दर कमी होऊन २ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. गेल्यावर्षी तो ४ पूर्णांक ६६ शतांश टक्के इतका होता. अन्न उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात घट झाल्याचं मंत्रालयानंं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर चार टक्क्याच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला होता, मात्र भाजीपाला, फळं, डाळी यांचे दर कमी झाल्याने एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर ३ पूर्णांक १६ शतांश टक्क्यावर आला आहे. जुलै २०१९ नंतर हा सर्वात नीचांकी किरकोळ महागाई दर आहे.