आज जागतिक चिमणी दिन. निसर्गाच्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चिमणी. पण वाढतं शहरीकरण, प्रदूषण यांचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असून हा पर्यावरणाच्या दृष्टीने धोका आहे. त्यामुळे चिमणीच्या संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतून सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं आश्पाक आत्तार या पक्षीमित्रानं अंगणात चिमण्यांसाठी घरटी बनवून तिथेच त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे. आजच्या जागतिक चिमणी दिनानिमित्त राबवत असणाऱ्या विविध उपक्रमांविषयी आश्पाक आत्तार यांनी सांगितलं.
बुलढाणा जिल्ह्यात चिमण्यांच्या संख्येत वाढ होत असून त्याबद्दल निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. पक्षीमित्र संजय गुरव यांनी चिऊताई घरकूल योजनेच्या माध्यमातून चिमण्यांना आसरा मिळवून दिला आहे. चिमण्या शेतातल्या किटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात मोलाची भूमिका बजावत असल्यानं प्रत्येक शेतकरी बांधवाने हा उपक्रम राबवण्यात पुढाकार घेण्याचं आवाहन संजय गुरव यांनी केलं आहे.