गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या WAVES अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा काल समारोप झाला. देशवासियांच्या उदंड प्रतिसादामुळं या परिषदेचं रूपांतर एका महालाटेत झाल्याचं मत माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं.
पहिल्यावहिल्या WAVES ला या क्षेत्रातल्या विविध लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. WAVES चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या WAVES Bazaar मध्ये या चार दिवसांमध्ये 1 हजार 300 कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. WAVESX च्या माध्यमातून 15 ते 16 स्टार्टअप्सची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असून यातून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने या परिषदेत सुमारे 8 हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार केले.
परिषदेच्या शेवटच्या दिवशी काल हजारो लोकांनी इथल्या प्रदर्शनांना भेट देऊन माध्यम, तंत्रज्ञान, तसंच आणि मनोरंजन क्षेत्रात सध्या सुरू असलेलं काम आणि घडामोडी जाणून घेतल्या. याशिवाय WAVES मध्ये झालेल्या विविध स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरणही काल झालं. वाह उस्ताद, सिंफनी ऑफ इंडिया, Battle of Bands आणि EDM चॅलेंजच्या विजेत्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आकाशवाणी बातम्यांसाठी, मुंबईहून, अंकिता आपटे.