जलसंपदा विभागाची दोन्ही महामंडळं स्वयत्त केली जाणार असून ही प्रक्रिया करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. महामंडळांना स्वायत्त केलं तर त्यांच्या उपलब्ध साधनांचा वापर करुन निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यासाठी महामंडळाचं स्वतंत्र पर्यटन विकास धोरण राबवलं जाईल, धरणाचं लाभ क्षेत्र, फुगवटा क्षेत्र इथं पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटनाला चालना दिली जाईल, सर्व धरणांवर फ्लोटिंग सोलर बसवून उर्जा निर्मिती केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
नदी जोड प्रकल्पांना चालना देणं, पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागात आणून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणं, हिंगोली जिल्ह्यात सुकळी आणि दिग्रस हे प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करुन मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर करणं, असे विविध प्रकल्प राबवले जातील. त्यासाठी तसंच स्वायत्ततेबाबत कार्यपद्धती ठरवण्यासाठी ‘मित्रा’ या संस्थेला सल्लागार म्हणून नेमलं आहे. शिवाय आर्थिक सल्लागारही नेमले आहेत, असं विखे पाटील यांनी सांगितलं.