देशातल्या सर्व महानगरपालिकांमधे जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नई मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना आखत असून २०२७ पर्यंत ती प्रत्यक्षात येईल असं ते म्हणाले.
देशात आतापर्यंत महानगरपालिकांच्या ८० लाख टन कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी करण्यात आला असून, यामध्ये अहमदाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.