लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ आहेत असून लोकसंख्येचा अभ्यास करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरणनिर्मिती यातला दुवा म्हणून महत्त्वाचं काम करतात, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या ६५ व्या आणि ६६ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. देशाला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यात लोकसंख्याशास्त्र अमूल्य योगदान देतं, यातल्या आकडेवारीच्या आधारे शाश्वत विकास, आर्थिक प्रगती, सामाजिक एकोपा, तसंच देशाच्या सुरक्षेततेच्या हिताची धोरणं आखता येतात, याकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. हीच आकडेवारी देशासमोरच्या बेरोजगारी, वैद्यकीय क्षेत्रातल्या अडचणी, स्थानिक समस्या अशा आव्हानांचा सामना करण्याचे उपाय शोधले जातात, असंही त्यांनी नमूद केलं. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरता मर्यादित राहता कामा नये, असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मांडलं. दीक्षांत समारंभ म्हणजे या संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवरच्या वाढलेल्या जबाबदारीचं प्रतीक आहे, या संस्थेशी, सहकाऱ्यांशी जोडलेले राहा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.
या संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडताना या विद्यार्थ्यांच्या मनात फक्त त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्वप्नं नाहीत, तर संपूर्ण देशाच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे या क्षेत्रात काम करताना समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी विद्यार्थ्यांना केलं. ६५ टक्के ३५ वर्षं वयाखालचा असलेला भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आह. हीच भारताची सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि यांच्याच जोरावर विकसित भारताचं स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. देवराम नागदेवे, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.