जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. या पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातले विविध २६ रस्ते वेगवेगळ्या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील.
आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज सकाळी बेलापूरहून राहुरीकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात ६० हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
मुक्ताईनगर इथल्या संत श्री मुक्ताबाईंची पालखी बीड जिल्ह्यात असून, आज गढी इथल्या भवानी मंदिर परिसरात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे.
येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार असून मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. यावर्षी श्री विठ्ठल- रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष सोय केली आहे. सुमारे ३५ हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहू शकतील असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. शिवाय भाविकांना पिण्याचं पाणी, चहा आणि जेवणाची सोय केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावर्षी आषाढी वारीसाठी सुमारे १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.
नाशिकच्या सायकल क्लबने सुरु केलेल्या नाशिक ते पंढरपूर ३६० किलोमीटर पर्यावरण संवर्धन सायकल वारीचं यंदा १३वं वर्ष आहे. या वारीला आज सकाळी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे विठ्ठलाच्या आरतीने प्रारंभ झाला त्यावेळी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष हरिष बैंजल, यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय संचार ब्यूरो आणि परभणी सायकलर्सच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त सायकल वारी आजपासून परभणीतून रवाना झाली. परभणी सायकलर्स वारीचं हे सातवं वर्ष असून, या वारीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व आणि जनजागृती करण्यात येणार आहे. ही वारी परभणी ते पंढरपूर हे ३०० किलोमीटरचं अंतर दोन दिवसात पार करणार आहे.
यंदा रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकलवारी निघाली आहे. आज (२० जून) सकाळी रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले. रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसांत पूर्ण करणार आहेत.