उत्तराखंडमध्ये, उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली इथं आपद्ग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत, तसंच परिसरातल्या पायभूत सुविधा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आज सकाळी ७४ जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त भागात अडकलेले यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांचं बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूने लष्कर आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
बचाव कार्याला गती देण्यासाठी तसंच आवश्यक लॉजिस्टिक सहाय्य देण्यासाठी भारतीय हवाई दलाची ३ चीता हेलिकॉप्टर जॉली ग्रँट विमानतळावर दाखल झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली.