भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते.
सर्व्हरसह उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकांसाठी ऊर्जा कार्यक्षम मायक्रो-प्रोसेसर विकसित करणार असून त्यासाठी सरकार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. चित्रफीती किंवा ऑनलाईन सामुग्रीची सत्यता पडताळ्यासाठी, त्यातलं तथ्य तपासणीसाठी एक चॅटबॉट देखील विकसित केला जात असून त्याच्या सहाय्यानं बनावट सामुग्रीचा प्रसार रोखला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. झोहो या देशात विकसित केलेल्या डिजीटल मंचावर बारा लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आल्याची माहीती वैष्णव यांनी दिली.