नागपूरमधे कामठी इथं आज राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. देशातली १४० कोटी आणि महाराष्ट्रातली १४ कोटी जनता ही भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे, असं ते यावेळी म्हणाले.
सोलापूर शहरात देखील आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथंही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. उदगीर शहरातल्या छत्रपती शाहू महाराज चौकापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप शहिद कॅप्टन कृष्णकांत चौकात झाला. जळगाव जिल्ह्यातही तिरंगा यात्रा काढण्यात आली.