राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या.
दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर त्यांनी तालिका सदस्य म्हणून अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची नियुक्ती केली. त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली.
यानंतर, माजी आमदार रोहिदास देशमुख, विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉ. श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला आणि सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.