भारताच्या पुरुष हॉकी संघानं काल आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियावर ४-१ असा विजय मिळवला. भारताकडून दिलप्रीत यानं दोन, तर सुखजीत आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासोबतच भारताचा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं अभिनंदन केलं. गतविजेत्या दक्षिण कोरियाला भारतानं हरवल्यामुळे हा विजय आणखी विशेष असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. भारतीय हॉकी आणि क्रीडाविश्वासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही ते म्हणाले.