राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तेव्हा ते बोलत होते. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी हा प्रशिक्षण आठवडा आजपासून येत्या ९ मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.
टेक वारी या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रभावी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर प्रभू गौर गोपालदास यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान या विषयावर निती आयोगाच्या देबजानी घोष यांचं व्याख्यान तसंच, शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसं करावं या विषयावर मायक्रोसॉफ्ट, नॅसकॉमचे मंदार कुलकर्णी, त्यानंतर एआय विषयी अभिषेक सिंग यांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय मधुरा बाचल, अमिताभ नाग, ऋजुता दिवेकर यांचीही व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या संत परंपरा आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या “ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने ‘टेक वारीचा’ समारोप होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.