‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष आरोग्य अभियानाचा लाभ राज्यातल्या १ कोटीहून अधिक नागरिकांना मिळाल्याचं राज्य शासनानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राबवलेल्या या अभियानात महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी, विविध जनजागृती उपक्रम, आणि आरोग्य शिबिरं जिल्हा आणि महापालिका स्तरावर आयोजित करण्यात आली. या अभियानांतर्गत एकूण २ लाख ३० हजार ६५३ आरोग्य शिबिरं घेण्यात आली, त्यात ३ हजार ४१३ विशेष शिबिरांचा समावेश होता. या शिबिरांमध्ये १ कोटी ८ लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३२ लाख ७१ हजार पुरुष आणि ७५ लाख ८७ हजार महिला लाभार्थी ठरल्या.