देशाचे सरन्यायाधीश जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर येतील, तेव्हा विहीत राजशिष्टाचाराचं पालन व्हावं, यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असताना शिष्टाचाराचा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कायमस्वरूपी राज्य अतिथी असतात, त्यामुळे शिष्टाचारानुसार विमानतळावर त्यांच्या स्वागताची आणि त्यांना निरोप द्यायची व्यवस्था राजशिष्टाचार उपविभाग करतो. विहीत राजशिष्टाचारानुसार सरन्यायाधीश मुंबईत आल्यास मुख्य सचिव किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पोलीस महासंचालक किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि राज्यात इतरत्र आले असता संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, तसंच पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी त्यांचं स्वागत करावं, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
या प्रकरणी राज्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.