राज्यात साखर गाळप हंगामाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाकडून सुरू असून, दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे.
राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितलं की, उर्वरित कारखान्यांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि निधी भरण्याची प्रक्रिया प्रादेशिक स्तरावर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीनं गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शनिवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
७२ कारखान्यांच्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असून, ७८ कारखान्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऊस गाळपाशी संबंधित विविध निधी भरण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरी त्यासाठी हमीपत्र सादर करणं बंधनकारक आहे, अशी माहितीही डॉ. कोलते यांनी दिली.