महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला. राज्याच्या नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४६ हजार ५७९ नियमित विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदाच्या निकालात १ पूर्णांक ७१ शतांश टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी ९६ पूर्णांक १४ शतांश टक्के इतकी आहे. तर ९२ पूर्णांक ३१ शतांश टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९८ पूर्णांक ८२ शतांश टक्के इतका आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे.
विभागनिहाय टक्केवारीत पुणे विभाग -९४ पूर्णांक ८१ शतांश, नागपूर – ९० पूर्णांक ७८ शतांश, छत्रपती संभाजीनगर ९२ पूर्णांक ८२ शतांश, मुंबई ९५ पूर्णांक ८४ शतांश, कोल्हापूर – ९६ पूर्णांक ७८ शतांश, अमरावती – ९२ पूर्णांक ९५ शतांश, नाशिक – ९३ पूर्णांक ०४ शतांश, लातूर – ९२ पूर्णांक ७७ शतांश टक्के इतका निकाल लागला आहे.