पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधे दहशतवाद्यांचे 9 तळ उद्धवस्त करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा पाक लष्कराला धक्का न लावता पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवल्याचं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं.
पाकिस्ताननं यापुढे कोणतीही आगळीक केली, तर भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचा सज्जड इशारा भारतानं दिला आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली. मंत्रिमंडळ सदस्यांनी या मोहिमेबद्दल मोदी यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली.