समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
राज्यातले २४ जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाने राज्याचं एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्याने तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल, यामुळे बंदर-केंद्रित विकास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त आठ तासांत करता येणार आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमधून जाणारा या शेवटच्या टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरागांमधून बोगदे आणि पुलांद्वारे पूर्ण केला आहे. यात जवळपास ११ किलोमीटर लांबीचे ५ बोगदे असून इगतपुरीतला ८ किलोमीटर लांब, १७ मीटरपेक्षा जास्त रुंद आणि ९ मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा आहे.
या बोगद्यात बसवलेल्या ‘जनरेशन व्हेइकल एक्सिट सिस्टम’चा वापर भारतात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. वाशीच्या तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. राज्याचे मंत्री दादाजी भुसे, शिवेंद्रराजे भोसले आणि मेघना बोर्डीकर, वरिष्ठ अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.