रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात इथं सुरु असलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी, सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढचा खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा करताना त्यानं १९ चौकार आणि ९ षटकार ठोकले. सुवेद पारकरनं ७५, तर अथर्व अंकोलेकरनं नाबाद ३५ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात ५६० धावांचा डोंगर उभा करता आला.
हैदराबादच्या पहिल्या डावात त्यांचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र नंतर, राहुल सिंग आणि कोडीमेला हिमतेज यांनी डाव सावरला. दिवस अखेर हैदराबादच्या २ बाद १३८ धावा झाल्या होत्या. राहुल ८२, तर हिमतेज ४० धावांवर खेळत होता.
ब गटात पुण्यात सुरु असलेल्या सामन्यात आज दिवसअखेर महाराष्ट्रानं गोव्यावर ९७ धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राच्या ८ बाद ३०६ धावा झाल्या होत्या.