प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील अर्थसंकल्पीय समितीनं ६ हजार ४०५ कोटी रुपयांच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या नवीन मार्गामुळे संपर्क, वाणिज्य आणि शाश्वतता यामध्ये सुधारणा होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. या मार्गांच्या बांधकामांदरम्यान 108 लाख मानव-दिवसांची थेट रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पांमध्ये कोडेरमा – बारकाकाना डबलिंग आणि बल्लारी – चिकजजूर डबलिंग रेल्वे मार्गाचा समावेश आहे. हा प्रकल्प झारखंडच्या एक प्रमुख कोळसा उत्पादन क्षेत्रातून जातो. १३३ किलोमीटर लांब असलेल्या कोडेरमा – बारकाकाना डबलिंग प्रकल्पामुळे ९३८ गावं आणि १५ लाख लोकसंख्या संपर्कात येईल. बल्लारी – चिकजजूर डबलिंग रेल्वे मार्गाची लांबी १८५ किलोमीटर असून, तो मंगळूर बंदराला सिकंदराबादशी जोडेल. हे प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केले जातील.
झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये असलेल्या या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान क्षेत्रात सुमारे ३१८ किमी वाढ होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली.