मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होत असून लौकरच या दोन शहरातलं अंतर केवळ २ तास ७ मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुण्याहून मध्यप्रदेशातल्या रिवा कडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. गेल्या अकरा वर्षात ३४ हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, असं ते यावेळी म्हणाले. देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं.