डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या 3 वर्षांत साडेसातहजारांहून अधिक नागरीकांचा मृत्यू  

मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षांत साडेसातहजार पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे ७ हजार३०० जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या महिन्यात मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान दोन लोकलमधले प्रवासी एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. तिला उत्तर देताना, सरकारी कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

 

तसंच लोकलची संख्या वाढवून लोकल गाड्यांना बंद होणारे दरवाजे लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं आणि यावर सकारात्मक निर्णय लवकरच होणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबई मेट्रोपोलिटन क्षेत्रात मेट्रोचं जाळं वाढल्यामुळे लोकलवरचा भार कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र या भागातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसं चित्र दिसत नाही, असं सरनाईक यांनी नमूद केलं.

 

लोकल ही जीवनवाहिनी असली, तरी पॉड टॅक्सी, मेट्रो, जलवाहतूक असे वाहतुकीचे इतर पर्याय वेगाने उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी, हे पर्याय काल्पनिक असून लोकलची दारं बंद केल्यास त्यामध्ये चिरडून लोकांचा जीव जाईल, अशी टीका केली. त्यावर सरनाईक यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली.