आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भर्ती केली जाईल, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. गुजरातमध्ये वलसाड इथे रेल्वे पोलीस दलाच्या एकेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता अत्याधुनिक उपकरणं दिली जातील, तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना प्रगत प्रशिक्षण दिलं जाईल, अशी घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी यावेळी केली.
कमी उत्पन्न असलेल्या गटांच्या कल्याणासाठी रेल्वे सेवा वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी अश्विनी वैष्णव यांनी केला. येत्या दिवाळी आणि छट पूजेसाठी रेल्वे १२ हजार विशेष गाड्या चालवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवेच्या बिलिमोरा या स्थानकालाही अश्विनी वैष्णव यांनी भेट दिली आणि तिथल्या कामाचा आढावा घेतला. बुलेट ट्रेन सेवेचा बिलीमोरा ते सूरत हा पहिला टप्पा २०२७मध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.