पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ झाली आहे. अमृतसरच्या मजीठा भागातल्या चार गावातल्या नागरिकांनी काल रात्री इथेनॉल मिश्रीत दारू प्यायली होती. याप्रकरणी दहा जणांना अटक केलं असून दोन उत्पादन शुल्क अधिकारी, एक पोलिस उपअधिक्षक आणि एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.
या घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी भेट घेत दोषींची गय केली जाणार नाही असं आश्वासन दिलं. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.