भारताच्या किनारपट्टीवरची राज्यं आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केरळात तिरुवअनंतपुरम मध्ये विळींजम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत भारतातली ७५ टक्के समुद्र मार्गानं होणारी आयात ही देशाबाहेरच्या बंदरांवर होत होती. ही सर्व प्रक्रिया अत्यंत खर्चिक होती. आता या विळिंजम बंदरामुळे हा खर्च वाचणार असून त्याचा उपयोग केरळवासियांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याकरता होईल, असंही ते म्हणाले.
विळींजम इथं ८ हजार ८०० कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे बंदर देशातलं पहिलं अर्धस्वयंचलित, तसंच खोल पाण्यातलं, कंटेनर वाहतूक करणारं बंदर ठरणार आहे. समारंभाच्या आधी प्रधानमंत्र्यांनी बंदर सुविधांना भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर, अमरावती इथं त्यांच्या हस्ते ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी झाली. भारतानं गेल्या १० वर्षांत भौतिक, सामाजिक तसंच डिजिटल प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून गेल्या दहा वर्षात बियाणं आणि खतासाठी १२ लाख कोटी खर्च केल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.