डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपतींचं देशवासीयांना संबोधन

युवा, महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृत काळात आघाडीवर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासीयांना संबोधित केलं. सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम तसंच समग्र आर्थिक विकासामुळं २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या.

सर्वसामान्यांचं आयुष्य, व्यापार-उद्योग सहज-सोपे व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. मुख्य प्रवाहातून दूर राहिलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोहोचली, तरच नवीन संधी उपलब्ध होतात, असंही त्यांनी सांगितलं. 

सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. भ्रष्टाचाराला थारा न देता सुशासनाच्या आधारे सरकार काम करत आहे, याकडे त्यांनी कालच्या भाषणात लक्ष वेधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. यातून आत्मनिर्भर भारत मोहिमेचीही यशस्वी चाचपणी झाल्याचं त्या म्हणाल्या. 

राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतीही यावेळी जागवल्या. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या राज्यघटनेतल्या मूल्यांचा उल्लेख त्यांनी केला. 

जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा आर्थिक वृद्धिदर सर्वाधिक असून यात देशातले शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं भरपूर योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.