देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट भारतातच उत्पादित व्हावी ही काळाची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी भारताचे प्रधानमंत्री म्हणून २०१४ मध्ये प्रथम शपथ घेतल्याच्या घटनेला आज ११ वर्षे पूर्ण झाली. याचं औचित्य साधून गुजरातमध्ये दाहोद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय रेल्वेच्या रेल्वे इंजीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण यावेळी मोदी यांच्या हस्ते झालं.
देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत आहे असं ते म्हणाले. स्मार्ट फोन, गाड्या, खेळणी, शस्त्रास्त्र, औषधं अशा अनेक वस्तू आपण इतर देशांना निर्यात करू लागलो आहोत, रेल्वे – मेट्रो आणि त्यासाठीचं आवश्यक तंत्रज्ञानही आपण स्वतःच बनवत असून ते निर्यातही करत आहोत असं ते म्हणाले. गुजरातसह देशभरताल्या कोट्यवधी नागरिकांनी दिलेल्या आशिर्वादाच्या शक्तीमुळेच मी अहोरात्र देशाची सेवा करू शकत आहे. गेल्या काही वर्षात देशानं दशकांच्या बेड्या झुगारणारे अभूतपूर्व निर्णय घेतले. आज देश प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. देश निराशेच्या अंधकारतून बाहेर पडून विश्वासाच्या प्रकाशात तिरंगा फडकवत आहेत. आज १४० कोटी भारतीय विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी झटत आहेत असं ते म्हणाले.
या स्वदेशी रेल्वे इंजीन उत्पादन प्रकल्पात देशांतर्गत वापर आणि निर्यातीच्या उद्देशानं ९ हजार अश्वशक्ती क्षमतेच्या इलेक्ट्रिक रेल्वे इंजीनचं उत्पादन घेतलं जाणार आहे. या प्रकल्पातून येत्या ११ वर्षात बाराशे इंजिनांची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या प्रकल्पातच तयार झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे इंजीनाला हिरवा झेंडाही दाखवला. या इंजिनामुळे भारतीय रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढणार आहे. हे इंजिनांमध्ये पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणालीनं सुसज्ज असणार आहे. यामुळे कमी उर्जा वापराचं आणि पर्यावरणीय शाश्वततेचं उद्दिष्ट गाठण्यालाही मदत होणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पात उत्पादित इंजिन उच्च गुणवत्तेचं आणि कमी खर्चात तयार केलं जातंय, त्यामुळे आपण त्याची निर्यातही करू शकणार आहोत. हे इंजिन म्हणजे एक चालतं फिरतं डेटा सेंटर आहे असं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमाआधी प्रधानमंत्री वडोदरा इथं एका रोड शो मध्ये सहभागी झाले. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. जमलेल्या नागरिकांनी प्रधानमंत्र्यांवर पुष्पवृष्टी केला. ऑपरेशन सिंदूरमधे महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबिय देखीलया रोडशोमध्ये सहभागी झाले होते.
प्रधानमंत्री आज संध्याकाळी भुज इथंही सुमारे ५३ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत.