प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमधील बिकानेर इथं अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. रेल्वे, रस्ते, उर्जा, पाणी आणि नवीन तसंच नवीकरणीय उर्जा क्षेत्रातले हे प्रकल्प आहेत. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री 103 पुनर्विकसित अमृत भारत स्थानकांचंही उद्घाटन करणार आहेत. 18 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 86 जिल्ह्यांतल्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.
स्थानिक कला, संस्कृती, परंपरांचं दर्शन घडवण्याच्या दृष्टीने या रेल्वेस्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. तसंच या स्थानकांवर दिव्यांग व्यक्तींसाठी खास सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये तेलंगणमधल्या बेगमपेठ या संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. बेगमपेठ हे सगळ्या महिला कर्मचारी अधिकारी असलेलं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक आहे. एकंदर 13 शे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून 2027 पर्यंत सुमारे 500 स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना दिली.