कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी, सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील, याची खात्रीही दिली.
भारताचं सामाजिक सुरक्षा कवच गेल्या दहा वर्षांमध्ये १९ टक्क्यांवरून ६४ पूर्णांक ३ दशांश टक्क्यापर्यंत वाढलं आहे. आयलोस्टॅट या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात ४५ टक्के वाढ दिसून आली आहे. भारतातले ९४ कोटींहून अधिक जणांना आता किमान एका सामाजिक संरक्षणाचा लाभ मिळत आहे. सामाजिक संरक्षण मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिनिव्हा इथे आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत आयलोस्टॅटच्या महासंचालकांशी द्विपक्षीय चर्चा करताना कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी गेल्या अकरा वर्षांत मोदी सरकारने हाती घेतलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. ही कामगिरी प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची, तसंच समावेशक आणि हक्कांवर आधारित सामाजिक संरक्षण परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारच्या अथक प्रयत्नांची साक्ष देते, असं मांडवीय यावेळी म्हणाले. आयलोस्टॅटचे महासंचालक गिल्बर्ट एफ. हाँगबो यांनी गरीब आणि कामगार वर्गासाठी भारताने सुरू केलेल्या कल्याणकारी धोरणांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.