सिक्कीम सह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सिक्कीम मधल्या विविध विकास कामांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते.
देशाचं प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, आणि म्हणूनच, केंद्रसरकारनं ईशान्येकडच्या प्रदेशाला विकासाच्या केंद्रस्थानी आणलं आहे. तसंच आपल्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणावर, सरकार ‘अॅक्ट फास्ट’ दृष्टिकोनानं काम करत आहे, असं ते यावेळी म्हणाले. भारताला ‘विकसित’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचा विकास आवश्यक असून, येत्या २५ वर्षांमध्ये सिक्कीमला जगाचं ग्रीन मॉडेल बनवण्याचं उद्दिष्ट ठेवायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री मोदी यांनी आज दूरस्थ पद्धतीनं सिक्कीम मधल्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उदघाटन केलं. नामची जिल्ह्यात साडेसातशे कोटी रुपये खर्चाचं ५०० खाटांचं जिल्हा रुग्णालय, आणि सांगाचोलींग इथला रोप वे, या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
प्रधानमंत्री आज दुपारी पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. याठिकाणी ते अलीपुरद्वार आणि कूचबिहार या जिल्ह्यांमधल्या गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी ते बिहार इथं भेट देणार असून, पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करतील. प्रधानमंत्री उद्या बिहारमध्ये कराकट इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशला भेट देणार असून, कानपूर नगर इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.