दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून टिपण्याचं सामर्थ्य भारताकडे असून पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील, अशी जागा आता उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंजाबमधे आदमपूर इथं हवाईदलाच्या तळावर ते आज सैनिकांशी संवाद साधत होते. ऑपरेशन सिंदूर मधे सेनादलांनी बजावलेल्या कामगिरीचा, सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि युद्धकौशल्याचा त्यांनी गौरव केला. ऑपरेशन सिंदूर मुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली, तसंच दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा मिळाला असल्याचं ते म्हणाले.
भारताने पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले असून यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही भारतानं पराभूत केलं. निष्पाप लोकांचा बळी घेतला तर आपला विनाशच होईल, हे दहशतवाद्यांना कळून चुकलं आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.